
श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्……….!
” कौंडीण्य गोत्राया: माधुरी प्रेत ऐष ते तिलतोयाज्जलिस्तवोपतिष्ठताम् ” असे म्हणुन दररोज दहावा, अकरावा, बारावा आणि चौदाव्या दिवशी चे क्लेश देणारे उच्चारण मनाला वेदना देणारे . १०/१६/४८ पिंड (भाताचे गोळे ) मनावर दगड ठेवून त्यावर काळे तीळ टाकुन पुजा संस्कार ! ” श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् “….!
नेमके हेच मला कधीच पटले नाही. दहादा …….प्रेते प्रेते म्हणायचं , आणि पापक्षालन म्हणुन दक्षिण स्वरुपात ब्राह्मण वृंदांना दक्षीणा द्यायची . सव्य, अपसव्य करीत जानवं डावीकडे , उजवीकडे फिरवत क्रिया सुरू ठेवायची. अस्थींना मंत्राग्नी आपल्या हाताने द्यायचा …. सर्व अगदी क्लेशदायक.
भाताचे गोळे मनावर दगड ठेवून करा त्यांवर इतर संस्कार . नुसता छळ . आत्माल्या मुक्तीसाठी कार्य करतांना मला ह्यातुन मुक्त कर असे म्हणावे लागते.
आधीच माणुस जवळची व्यक्ती आपल्यातुन नेहमी करता निघुन गेली ह्या दु:खात असतो . जवळची माणसं त्यांचे ते दु:ख सुद्धा एकट्याने अनुभवायला संधी देत नाही.
नुकताच काही क्षणांपुर्वी मृत्यू झाला आहे तो प्रसंग जेमतेम घडतो आणि आप्तेष्टांना कळत ते सुद्धा हतबल होऊन येतात. होत्याचे नव्हते झाले आहे असे वाटते , क्षणांपुर्वी ज्या व्यक्ती जवळ आपण होतो , कुठलाही आजार नाही अशी परिस्थिती . आणि मग मृत व्यक्तीचे ते शरीर व त्याचे हाल सुरु होतात . ते सर्व असह्य होत , आणि म्हणुनच मी समाज रुढी परंपरा यांचे विरोध पत्करून तयार होतो . ते शरीर जमीनीवर ठेवणं मान्य नाही , काय शास्त्र सांगते ते सांगु दे ! शेवटी श्राद्ध करतांना गुरुजी मी अमुक अमुक एक गोष्ट परंपरे नुसार केली नाही म्हणुन मी दक्षिणा स्वरुपात ते पापक्षालन करण्यास तयार आहे हे दहादा वदवुन घेतात.
सामान्य माणसाचं जीव जातो तेव्हा ते शरीर जमीनीवर अर्थींंग मिळावं , ” त्याचा त्याग करण्याची भावना निर्माण व्हावी ” ही कदाचित संकल्पना. पण जेव्हा एखादा पुढारी वा मान्यवर जेव्हा मृत पावतो तेव्हा ते कलेवर , पार्थिव तर मग आम्ही एका उंच टेबलावर, चबुतरा करुन अंत्य दर्शना साठी ठेवतो ते कसे !
” अरे जो देह उद्या पासुन दिसणार नाही” ती आजारी व्यक्ती नाही ! मग बसु देत ना थोड्या वेळ एकांतात जवळच्या व्यक्तींना , नातवांना . अनुभवु दे ते दु:ख , अगदी धाय मोकलुन रडु दे ना बाबा !
नको ती गर्दी , ते वारंवार मृत्यू कसा झाला ते विचारणं ! सांगेल ना कोणीतरी …..! आप्तेष्ट धीर धराना !
लगेच चौकशी सुरू ” नाही म्हणजे …. अंत्यविधी केव्हा ? वेळ ? कोठे ठिकाण ? परगावी असलेले मुलं बाळं आणि आप्तेष्ट येणार कां ? केव्हा येतात ? विमानाने की कार ने ? एक नाही हजार प्रश्न जे स्वतः ला सुचले नाही ते इतरांना सुचतात .
अरे बाबांनो थांबा ना ! कळवु सर्व तुम्हाला काय घाई आहे . तुम्ही तुमचे सर्व दिवसभराचे काम करुन या नां ! संध्याकाळी शिवाय शक्य नाही !
पण एवढ्याने कुठे समाधान होणार ! ” अहो सायंकाळी दहन त्याज्य ! सूर्यास्ता आधी व्हावयास हवें ! नाहीतर स्पेशल पर्मीशन कलेक्टर ची हवीं ! ….. ” माझ्या मनात आक्रमक विचार येतो अरे बाबा चिंता करु नकोस तुझ्या कलेवराला आम्ही सायंकाळ च्या आत दहन करु ” . पण मन दाबुन बुक्यांचा मार आज सहन करावा लागतो. सहनशक्ती पणाला लावावी लागते अन्यथा मंडळी पुन्हा तुमचा उद्धार करावयास तयार असतात.
पुढील चिंता अहो सामान आणावं लागेल , हार , फुले , शवपेटी , शववाहिका ….. सर्व चिंता ! ” जातोस तु ! आणतो स्व खर्चाने ! नाहीं ना मग कशाला चौकश्या ! ठरवेल न कोणी तरी आणि माझं घरचं कार्य तेव्हा मीच ते पैसे देणार! शेवटच्या क्रियेचे पैसे कुणाचे ठेवता येत नाही !
आणि मग अंत्य दर्शन ! सामाजिक छळ सुरु होतो , अरे नाव्ही दिसत नाही , केश वपन करायला हवं . काय म्हणता कोणीही करणार नाही . बापरे ! अरे बाबांनो माझा चेहरा विद्रुप कां करु ! तसाही तो फारसा कोणाला चांगला म्हणता येणार नाही. आता काय आक्रंदन करु ” भायो भायो म्होर भार्या छोड गयो रे ….ssss… . नंतर कोणी तरी म्हणतं डोके मांडीवर घ्या , तुळस तोंडात ठेवा . गंगाजल तोंडात टाका. मग कलेवर बाहेर आणुन दरवाज्यात आंघोळ घालण्याचा प्रयत्न.
काय गरज आहे शरीराचे हाल करण्याचे. जिवंतपणी घाला ना प्रेमाने आंघोळ , नाही तर आजारपणात . सार्वजनिक करुन काय साध्य होणार. जेव्हा जेवतांना ” पाणी घ्या हो फ्रिजच म्हणटले , तेव्हा उठा ना , आणि आणांना ” . आता गंगाजल टाका म्हणे ! . काय चेष्टा आहे .
सर्व होतं होतं अंत्यविधी होतात आणि तेथुन बाहेर पडण्यासाठी तयार होत नाही तर पुढील चिंता ! नाही म्हणजे रक्षा विसर्जन उद्या होणार की परवा ! उद्या शनिवार ! दुसराच दिवस ! झाले तर कुठे करणार ! वेळ केव्हाची ! कोणी यायचं! कुठे जमायचं! किती लोक आलेत तर चालतील! …………..???????
रक्षा विसर्जन करुन परत येण्या आधी मग ९/१०/११/१२ चे कसं ? ” मनात विचार येतो ! येतो थंडीत माझ्या सोबत घाटावर ! पुजेसाठी आहे वेळ” . जमत असेल तर माझेही करुन टाकु , अॅडव्हान्स मध्ये .
पण मनातले दाबुन ठेवण्याचा प्रयत्न करावा अपेक्षित असते. ” काटा रुते कुणाला , आक्रंदतात कोणी ” …. !
आता १३/१४ चे कसं घरी की तिर्थक्षेत्र स्थळी ! आणि हो ते उदक् शांती चे लक्षात असु द्या ! नाही म्हणजे पुढं घरात कार्य असतात तेव्हा शांती केलेली बरी ! पुढच्या पिढीला त्रास व्हायला नको!
अरे बाबांनो एवढी चिंता कश्याला , आणि असेलच तर स्वतः ची व्यवस्था आधी पासुन करुन ठेवा ना!
एकीकडे घरात मुलींची साक्षात आई मृत पावलेली , आणि तिनं आप्तेष्टांना मदतीस घेऊन ब्राह्मण वृंदांना तृप्त करण्यासाठी स्वयंपाक करायचा, लाडु भाजायचा , नव्हे अगदी कॅटररला पैसा देऊन आग्रहाने ब्राह्मण वृंदांना तृप्त करायचं ! दु:ख बाजुला सारणासाठी व म्हणे पुढल्या जन्मात आईला सहज जाता यावं त्रास नको म्हणुन! आप्तेष्टांना लाडु वाढायचे प्रसाद म्हणुन . अरे जिवंतपणी लागु दिला तर शुगर आहे मी गोड खात नाही म्हणालात . मग आता माझे मागे कश्याला लागताय !
अरे बाबांनो जिवंत पणी काय तो आनंद द्यायचा , व त्रास द्यायचा , तो बास झालं ना ! आता तरी पिच्छा सोडा ! ” शांती ने जंगु द्या त्या आत्म्याला ” ! तो म्हणतोय सुटलो या संसारातुन , मुक्त झालो ! स्वतंत्र झालो ! माझी मला पेस मिळु द्या ! खुप केले तुम्हा सर्वांचे !………..
माझं खरं तर कोणी माझ्या मृत्युनंतर श्राद्ध करुच नये ! ज्यांच्या मानगुटीवर मी जिवंत पणी बसलो ते बसलो , आणि कुणी सुटलाच ! तर मी भुत बनुन नक्की मला ज्याला छळाचे असेल त्याच्या मानगुटीवर बसणार हे मात्र नक्की .
तेव्हा मंडळी अशी चर्चा टाळा ! ज्याचे तो बघुन घेईल आणि तुमच्या कडुन मदतीची अपेक्षा असेल तर जरूर मदत करा . मात्र चर्चा नको!
इती श्राद्ध पुराण ………. समाप्त.


भेटायला येणारे गावातले वेळ काढून , तर वेळ व पै पैसा खर्च करून परगावहुन व्यक्ती विषयी संवेदना व्यक्त करण्यास येतात. त्यांचे कुटुंबातील सदस्यांन साठी असलेले प्रेम व जिव्हाळा ह्या कारणाने ते व्यक्त होत असतात. जुने प्रसंग आणि नुकतीच काही कार्य प्रसंगाने झालेली भेट. तसेच त्यावेळी मोकळेपणाने बोलून झालेले विषय , आठवणी डोळ्यासमोर घेर धरतं असल्याचे अनुभवले जाते.
पण असे लक्षात आले की जेव्हा एखादी स्त्री ही विधवा होते त्या वेळी ती कदाचित जास्त धायमोकलुन अश्रुंना वाट मोकळी करून देते. पण महिना दोन महिन्यांत ती एक खंबीर स्त्री म्हणुन कुठल्याही वयात तयार होते. तिला तिच्या कर्तव्याची जाणीव होते आणि ती संसार पुन्हश्च सावरुन घेत कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन दिनचर्या व्यवस्थीत करते. तिच्या वयानुरूप ती कुटुंबातील जवाबदाऱ्या निश्चित करते . ती नेहमी कुटुंबासाठी एक Pivot केंद्र स्थानी असते . सारं घर तिच्या भोवती चालतं. मग ती नोकरी करत असो वा नसो. जरी ग्रुहीणी (House wife) संकल्पनेतील असली तरी !
मात्र पुरुष वैधव्य असतांना एकटा राहो वा कुटुंबा सोबत तो फार तर काही कामे वाटुन घेतो . मग ते घर झाडणे , आवरणे, कपडे वाॅशिंग मशीन मध्ये धुणे, दुध भाजी , किराणा आणणे . तसेच नातवांना शाळेत नेआण करणं करीत असला तरी आणि अगदी भरगच्च पेन्शन आणणारा असला तरी तो संसारात गुरफटून घेत नाही.
पुरुष वैधव्य ते बद्दल समाजात खुप उत्सुकता असते असे जाणवले. घरी येणारी व्यक्ती त्या वेळी स्वतःच्या विषय मांडणीतुन परिस्थिती जाणुन घेण्यासाठी उत्सुक असते.
# नाही म्हणजे आता कसं , कुठं राहणार, एकटे राहणार , जेवणाचे कसे , डबा वगैरे लावला कां, घरकाम करणारी बाई आहे का ? मग कसं ? ( माझ्या मनातच मी म्हणतो बाई आणि बाटली पासुन दुर राहिलो आणि राहण्यासाठी प्रयत्न असेलच. अगदी वाटलंच तर तुम्हाला विचारु , मज जवळ पैसा नाही , तेव्हा तसे चोचले झेपणार नाही . शिवाय मी त्या पठडीतील नाही ) .
स्वैपाक कोण करणार , तुम्हाला येतो , खरंच एकट्याने करणारं. मुली कडे राहणार कां , राहावे काय हरकत आहे ( माळी आणि स्वयंपाकी म्हणून) .
Baby seating नसलं तरी नातवांना आजोबा हवेत. ( नातु म्हणतील नको रे बाबा , थोड्यावेळ ठीक खेळण्या पुरते ) .
मी ज्यांच्या कडे १५ तास कुठलीही कारणाने थांबलो नाही , ते म्हणतात या निवांत १५ दिवस मुक्काम करून राहायला .
ना ना प्रश्न , अगदी मला सुचले नसतील असे. त्यात माझी परीक्षा असते. मी उत्तर देणे अपेक्षित असते.
काही तरी विषय असावा लागतो.
खरं तर मलाच आता एकटं राहिलेलं चालेल जोवर मी कुणाचीही मदत न घेता जगु शकेल तोवर. अगदी सहजपणे श्वास थांबावा आणि निघुन जावं आठवणी ठेऊन. आपली अडचण कोणास होता कामा नये.
खरं तर माझं आणि माधुरी चे ठरलं होतं कुणाच्या संसारात लुडबुड नको.
बघु आयुष्यात काय लिहुन ठेवलं आहे.

Leave a Reply