“मनोगत”!

सौ. सुचेता चितळे

१९७५ साली लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल या शाळेतून आम्ही सर्व ११ वी मॅट्रिक पास झालो. तेंव्हा ११ वी ची आमची शेवटची बॅच होती. आमच्या वर्गात तेंव्हा ८ मुली आणि साधारण ३०-३५ मुले होती. मला आकडा नक्की आठवत नाही. आम्ही मुली फारच कमी असल्यामुळे आमच्यात बऱ्यापैकी एकी होती आणि ह्याच दुसरं कारण म्हणजे तेंव्हा मुले आणि मुली एकमेकांशी बोलत नसत, तेंव्हा भांडून कसं चालेल? आता मुलांशी का बोलत नव्हतो, ह्याला कारण असं काही नाही. पण त्या काळी तशी पद्धत नव्हती असं म्हटलं तरी चालेल. मला अजूनही आपल्याला Send Off  दिला तो  दिवस आठवतो. तो क्षण असा होता कि कॉलेजच  मोकळं वातावरण खुणावत होत व शाळेतल्या आपल्या सवंगड्याना वारंवार भेटू शकणार नाही ह्याची खंत होती. अशा वातावरणात सुतवणे सरांनी म्हंटलेलं भावपूर्ण गाणं ‘अशी पाखरे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती’ हे ऐकून मलातरी गहिवरून आलं होत. खरं बघितलं तर आपण कितीही मोठं झालो तरी बालपणीच्या व शाळेच्या गोष्टी निघाल्यावर प्रत्येकजण त्या विश्वात रमतो, सुखावतो.

आपण आता खऱ्या अर्थानं नवीन सहस्त्रकात पदार्पण केलं आहे. आपण शालेय शिक्षण पूर्ण करून २५ वर्षे झाली. बरेचदा आपल्या काही जणांची म्हणजे धनंजय परांडे, राजू पारखी वगैरेंची भेट झाल्यावर आपण आपल्या वर्गातील मुलं मुळींच get-to-gather करूया हा विषय निघायचा व तिथंच थांबायचा. कदाचित प्रत्येक गोष्ट घडायला योग यावा लागतो असं म्हणतात तेच खरं आहे. ७-८ दिवसापूर्वीच आमच्यापैकी नरेंद्र देशपांडे जो सध्या ऑस्ट्रेलियात राहतो, तो माहेरपणासाठी नागपुरात आल्याचं कळलं व आपल्याबरोबरच्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींना भेटायची इच्छा आहे असे समजल्यावर चक्र भराभर फिरत गेली. इतकी वर्ष जी गोष्ट साध्य होत नव्हती ती ६ – ७ दिवसात पूर्णत्वाला आली. राजू पारखी, धनंजय परांडे, हितेंद्र पांडे व आशुतोष ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन नागपूरातील आणि परगावातील मित्रांना ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. परंतु ही अतिशय short notice असल्यामुळे सर्वांना with family येणं जमलं नाही. आपण एका चांगल्या क्षणाला मुकणार ह्याच त्यांना वाईट वाटल. पण पुढच्या वेळी आपण हे स्नेहमिलन परगावच्या सोयीनीच ठरवणार आहोत. नागपुरातील मित्र मैत्रिणींचे पत्ते शोधून त्यांना कळवायला फारसा वेळ लागला नाही. आणि अश्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम ठरला. ह्या सगळ्या धावपळीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली ती अशी कि ज्याला म्हणून प्रकर्षाने या संदर्भात आपण भेटलो त्या प्रत्येकाची असं संमेलन व्हावं अशी इच्छा होती. ह्या गोष्टीचा जरा अंतर्मुख होऊन विचार केला तेंव्हा एकमेकाबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम व विश्वास हीच ह्यामागची कारण असावीत हे जाणवले. आता कार्यक्रम कसा असावा ह्याची चर्चा सुरू झाली व प्रत्येकजण आपलं वय विसरून शाळेतल्या आठवणींमध्ये स्वतःला विसरून गेला. त्यानंतर कुठे जमायचं, काय कार्यक्रम करायचे हे ठरल्यावर तब्बल  २५ वर्षांनी हा सुवर्णदिन उगवला.

“Acting on a good idea is much better than having a good idea.”

हे वाक्य आम्ही फिरायला जातो तेंव्हा Seminary Hill जवळील परिवारात एका बोर्डवर लिहिलेल मी रोज वाचते. पण ते खरोखर किती योग्य आहे ह्याची प्रचिती मला आज सगळ्यांचे प्रफुल्लित चेहरे बघितल्यावर आली.

आता ह्या संमेलनाला मोठ्यांचे आशीर्वाद हवेतच, म्हणूनच आई वडिल्यांच्या बरोबरीने आपल्याला ज्यांनी घडविले, अभ्यासाबरोबर शिस्त आणि माणुसकी ज्यांनी ज्यांनी शिकविली, त्या गुरुजनांना पण आमच्या आनंदात सहभागी करायचं आम्ही ठरवल. आज २५ वर्षानंतर त्याच्या सहवासाचा आनंद लुटता यावा म्हणून श्री पेंढारकर सर व त्यांच्या सुविद्य  पत्नी, श्री एकताटे सर, डॉक्टर सोनी सर, श्री नांदगावकर सर व त्यांची पत्नी ह्यांना आमंत्रण दिल्यावर आम्ही सगळे अजूनही त्यांना विसरलो नाही या गोष्टीचा आनंद झाला. ह्या सगळ्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी वेळ काढला ह्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे त्यांची आभारी आहे. सहजच मनात विचार आला की आपल्यासारखे असंख्य विद्यार्थी आपल्या या शिक्षकांच्या हाताखालून जात असतील. एवढ्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं म्हणजे जरा कठीणंच काम आहे ना. अशावेळी शिक्षक व विद्यार्थी ह्यातील महत्वाचा दुआ म्हणजे, विद्यार्थ्यांचा शिक्षकाबद्दलचा आदर व त्यांचं विद्यार्थ्यांवरील प्रेम. अर्थात निर्व्याज प्रेम व आपुलकी ह्यामुळेच आज आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आलो आहोत.

ह्याप्रसंगी मला अजून एक सांगावस वाटत की आम्ही सगळे एकत्र शिकलो, वाढलो व क्वचित प्रसंगी भांडलोही. आमच्यात रेशीमबंध आहेत  म्हणून आम्ही एकत्र आलो. पण आमच्या सहाध्यायींच्या बायका, नवरे व मुलंही तितक्याच प्रेमाने व उत्साहाने सहभागी झाले, सामावले हा खरोखरीच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांचा उत्साह आणि अमूल्य साथ आम्हाला यापुढेही हवी आहे. तेंव्हा आपण २५ वर्षापर्यंत काही कारणास्तव जमू शकलो नाही याची खंत करायचं सोडून यापुढे एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊया. आज जस जमलो तस वारंवार भेटूया. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांमधल्या निर्व्याज प्रेमातून आपली मुलं बराच काही शिकतील.

भूतकाळ मनुष्याला स्मृतीचा आनंद देतो असं म्हणतात. आज बऱ्याच वर्षांनी आपण सर्व तो अनुभवणार आहोत कारण आजचा वर्तमानकाळ आपल्याला तो अनुभवायची संधी देतोय. असा तिलकशर्करायोग जुळून आला आहे. त्याचा आपण मनमुराद आनंद लुटूया व प्रौढत्वी निज शैशवास जपणे ही उक्ती सार्थ करूया.


Posted

in

by

Tags:

Comments

One response to ““मनोगत”!”

  1. dhananjay parande Avatar
    dhananjay parande

    These are the thoughts expressed by Sau. Sucheta Chitaley on the occasion of the get-to-gather of our batchmates in Nagpur on 13.01.2001.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *